Zeeshan Siddique comment on Baba Siddique shot Dead : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या 12 ऑक्टोबर रोजी झालेल्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. वांद्रे येथील त्यांच्या मुलाचे, आमदार झिशान सिद्दिकी यांचे कार्यालयाबाहेरच हा हल्ला घडला. गोळ्या लागल्यानंतर बाबा सिद्दिकी यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, पण दुर्दैवाने रुग्णालयात पोहोचण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने सिद्दिकी कुटुंबासोबतच त्यांच्या समर्थकांमध्येही शोक आणि असुरक्षिततेची भावना निर्माण केली आहे.
झिशान सिद्दिकी यांनी या हत्येच्या दिवशी काय घडले हे स्पष्ट केले. त्या दिवशी झिशान आणि बाबा सिद्दिकी हे दोघेही त्यांच्या कार्यालयात कामाविषयी चर्चा करत होते. काही वेळाने बाबा सिद्दिकींना भूक लागल्याने ते जवळच्या उडुपी रेस्टॉरंटमध्ये इडली खायला गेले. दोन मिनिटांनी त्यांनी तिथून बाहेर पडताच, अचानक त्यांच्यावर गोळीबार झाला. झिशान यांनी सांगितले की, “मी दोन मिनिटांतच त्यांच्याशी बोललो आणि ते बाहेर पडले, त्यानंतर लगेच ही दुर्दैवी घटना घडली.
ही घटना झिशान सिद्दिकी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी अत्यंत धक्कादायक आहे. निवडणूक काळात वडील या क्षणी सोबत नसणे त्यांच्यासाठी अधिकच दुर्दैवी आहे. “हे कोणत्याही कुटुंबासोबत घडू नये. दोन मिनिटांतच एखाद्या कुटुंबाला निराधार केले जाते, आणि जे घडले ते खूपच दुर्दैवी आहे. आम्हाला न्याय मिळावा, अशी आमची मागणी आहे,” असे झिशान म्हणाले.
या हत्येमागे नेमके कोण असू शकते, यावरही झिशान सिद्दिकींनी भाष्य केले. घटना घडल्यानंतर लगेचच काही माध्यमांत बिश्नोई गँगच्या सहभागाचा उल्लेख केला जात होता. बाबा सिद्दिकींचे शरीर रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच ही माहिती प्रसारित होऊ लागली होती. याबाबत झिशान सिद्दिकी म्हणतात, “एका विशिष्ट नरेटिव्ह सेट केला गेला. माझे वडील रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच बिश्नोई गँगचे नाव येऊ लागले. मात्र, आम्हाला विश्वास आहे की मुंबई पोलीस या प्रकरणात सर्व शक्यता तपासून आमच्याला न्याय देतील.
झिशान यांनी पोलिसांशी सहकार्य करण्याची भावना व्यक्त करत, कुटुंबाच्या मनातील शंका व संशय पोलिसांसमोर मांडल्याचेही सांगितले. ते म्हणाले, “मुंबई पोलिसांनी सर्व बाजूंनी तपास केला पाहिजे. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, पोलिस जलदगतीने कारवाई करतील.
ही घटना नक्कीच महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात एक गंभीर चर्चा आणि चिंता निर्माण करणारी आहे. बाबा सिद्दिकींसारख्या प्रमुख नेत्यावर हल्ला होणं हे एक दुर्दैवी उदाहरण आहे. त्यांच्या हत्येने त्यांच्या कुटुंबाबरोबरच समाजात एक अस्वस्थता निर्माण केली आहे.