आयपीएल 2025 हंगामात चेन्नई सुपर किंग्जच्या कामगिरीने त्यांच्या चाहत्यांची मोठी निराशा केली आहे. अनेक सामन्यांमध्ये पराभवाचा सामना केल्यानंतर, सीएसकेचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे. संघाच्या सुमार प्रदर्शनावर सतत प्रश्न उपस्थित होत आहेत आणि सर्वांचे लक्ष माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीकडे वळले आहे, जो यंदा पुन्हा एकदा नेतृत्व करत आहे. मात्र, धोनीच्या अनुभवी नेतृत्वाखालीही संघाची कामगिरी विशेष सुधारली नाही.
Virender Sehwag On Ravindra Jadeja
या संपूर्ण गोंधळात माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने आपली स्पष्टवक्तेपणा कायम ठेवत चेन्नईच्या खेळाडूंवर, विशेषतः फलंदाजांवर जोरदार टीका केली आहे.
जडेजाची मोठी निराशा
या हंगामात सर्वाधिक अपेक्षा ठेवलेल्या खेळाडूंमध्ये रवींद्र जडेजाचे नाव वरचं होतं. मात्र, त्याची कामगिरी अपेक्षेच्या तुलनेत खूपच फिकी पडली. 18 कोटी रुपयांना कायम ठेवलेला हा अष्टपैलू 9 सामन्यांत केवळ 166 धावांचा टप्पा गाठू शकला. त्याची सरासरी 27.66 तर स्ट्राईक रेट 125.75 इतकाच राहिला आहे. केवळ एका अर्धशतकाची नोंद त्याच्या खात्यात आहे, जे संघासाठी पुरेसे ठरले नाही. सेहवागने जडेजावर टीका करत म्हटलं की, एसआरएचविरुद्ध जडेजाने एका टोकाला चिकटून फलंदाजी करायला हवी होती. परिस्थिती कठीण असतानाही त्याने जबाबदारीने खेळायला हवे होते.
Virender Sehwag On Ravindra Jadeja
फलंदाजांची घाई ‘घरी’ जाण्याची?
सेहवागने केवळ जडेजाच नाही, तर संपूर्ण फलंदाजीनाच धारेवर धरलं. तो म्हणाला, कधी कधी मला वाटतंय मी स्पर्धा मध्येच सोडून घरी जावं. चेन्नईचे फलंदाजही तसंच वाटतंय का, असं त्यांच्या खेळावरून वाटतंय. त्यांना जणू घरी परतण्याची घाई झालेली आहे. त्याने असेही नमूद केले की, किमान एखाद्या फलंदाजाने तरी जबाबदारी घेतली पाहिजे होती. जडेजाने तरी 15-18व्या षटकापर्यंत खेळपट्टीवर टिकून राहण्याचा प्रयत्न करायला हवा होता. स्ट्राईक रेट बघा, किती खराब आहे!
Virender Sehwag On Ravindra Jadeja
सॅम करन तिसऱ्या क्रमांकावर का?
फलंदाजीतील गोंधळावरही सेहवागने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. संघात इतके चांगले फलंदाज असताना सॅम करन तिसऱ्या क्रमांकावर का फलंदाजीला आला? असे प्रश्न उपस्थित करत सेहवागने संघ व्यवस्थापनावरही टीका केली. त्याच्या मते, सॅम करनच्या जागी ब्रेव्हिस फलंदाजीला येऊ शकला असता. त्यानंतर शिवम दुबे, मग जडेजा, करन आणि दीपक हुड्डा अशी व्यवस्था करता आली असती. सेहवागने असेही सांगितले की संघाला ऋतुराज गायकवाडच्या अनुपस्थितीची प्रचंड उणीव भासत आहे. ऋतुराजची आक्रमक आणि स्थिर फलंदाजी संघासाठी आधारस्तंभ ठरत असे, जी यंदाच्या मोसमात दिसली नाही.