पालघर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्रीनिवास वनगा, यांचा तिकीट कापल्यावर राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. सोमवारपासून ते अचानक बेपत्ता झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांसह कार्यकर्त्यांतही चिंतेचं वातावरण होतं. पण अखेर ३६ तासांनंतर श्रीनिवास वनगांनी आपल्या कुटुंबीयांशी संपर्क साधला आहे. सध्या ते विश्रांती घेत असल्याची माहिती मिळाली आहे.
श्रीनिवास वनगा हे पालघर विधानसभेतून शिंदे गटाचे आमदार आहेत, परंतु यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांचं तिकीट कापून माजी खासदार राजेंद्र गावित यांना उमेदवारी देण्यात आली. या निर्णयामुळे वनगा प्रचंड नाराज झाले आणि तिकिट कापल्यामुळे वैतागले होते. त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्या नाट्यमय बेपत्ता होण्यामुळे त्यांच्या समर्थकांत मोठी खळबळ उडाली होती.
सोमवारी रात्री श्रीनिवास वनगा अचानक आपल्या घरातून बाहेर पडले. त्यानंतर त्यांचा फोनही बंद झाला होता, आणि त्यांनी कोठे जाणार हे कोणालाही सांगितले नव्हते. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले. कुटुंबीयांनी आणि कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे त्यांच्या बेपत्त्याची तक्रार केली. पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात मोहिम हाती घेतली होती, आणि त्यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली होती. अखेर ३६ तासांच्या प्रतीक्षेनंतर श्रीनिवास वनगा यांनी कुटुंबाशी संपर्क साधल्याची बातमी समोर आली आहे.
श्रीनिवास वनगांच्या पत्नी सुमन वनगा यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना सांगितलं की, “परवा रात्रीपासून सर्वजण चिंतेत होते. मुख्यमंत्र्यांनीही फोन करून त्यांच्या स्थितीची विचारपूस केली. अखेर ते रात्री घरी आले आहेत. त्यांची तब्येत ठीक नाही आणि ते विश्रांती घेत आहेत.” सुमन वनगांनी सांगितलं की श्रीनिवास यांनी त्यांचा पत्ता उघड केलेला नाही, मात्र त्यांच्या सोबत काही निष्ठावंत कार्यकर्ते आहेत.
शिंदे गटाच्या उमेदवारी जाहीर केल्यानंतर वनगांनी नाराज होऊन माध्यमांसमोर आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. तिकीट कापल्यावर ते भावूक होत म्हणाले, “उद्धव ठाकरे हे देवमाणूस होते. मी चुकीच्या माणसांसोबत गेलो, आणि माझा विश्वासघात झाला.” निवडणूक काळात झालेल्या या राजकीय नाट्यात त्यांच्या या वक्तव्याने अनेकांमध्ये चर्चेला तोंड फुटलं.
श्रीनिवास वनगांची अचानक झालेली बेपत्ता होण्याची घटना आणि त्यानंतरच्या चिंतेमुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचं वातावरण होतं. त्यांचा शोध घेत असताना त्यांच्या घराबाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांची संख्या वाढली होती, आणि पोलिसांनीही कडक सुरक्षा व्यवस्थापन केलं होतं.
राजकीय असंतोष, भावनिक उन्माद, आणि सत्ता संघर्ष यामुळे श्रीनिवास वनगा यांच्या बेपत्ता होण्याच्या घटनेने पालघरच्या राजकीय वातावरणात गोंधळ उडवला. आता ते सध्या विश्रांती घेत आहेत, मात्र त्यांच्या भावनिक प्रतिक्रियेने आणि अचानक घरातून जाण्याच्या निर्णयाने त्यांच्या भवितव्यासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.