Sharad Pawar : फलटण येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी घेतलेल्या प्रचारसभेत भाजप सरकारच्या कार्यकाळातील महिलांवरील अत्याचार आणि राज्यातील प्रमुख समस्या यावर कडाडून टीका केली. दीपक चव्हाण यांच्या प्रचारासाठी आयोजित या सभेत पवारांनी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत, सध्याच्या सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, “भाजप सरकारच्या सत्ताकाळात महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. गेल्या दोन वर्षांत 67,381 महिलांवर अत्याचार झाले असून, रोज पाच महिलांवर गंभीर स्वरूपाचे अत्याचार घडत आहेत. इतकेच नव्हे, तर 64,000 महिला बेपत्ता झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. हे वास्तव भयावह असून, महिलांना आज अर्थसहाय्य नव्हे, तर संरक्षणाची खरी गरज आहे.”
पवार यांनी पुढे पोलिस ठाण्यांमध्ये नोंदवल्या जाणाऱ्या अत्याचारांच्या घटनांकडे लक्ष वेधत, सध्याच्या सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “महिलांच्या सुरक्षेबाबत सरकारने गंभीर पावले उचलण्याऐवजी फक्त घोषणांचा सपाटा लावला आहे,” असे ते म्हणाले.
शेतकरी आत्महत्या आणि बेरोजगारीवर गंभीर प्रश्न
महिलांच्या सुरक्षेबरोबरच पवार यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्नही मांडला. “या सरकारच्या कार्यकाळात 20,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकरी अस्वस्थ असून त्यांना दिलासा देण्याऐवजी त्यांचे प्रश्न अधिक गंभीर केले जात आहेत,” असे त्यांनी स्पष्ट केले.
बेरोजगारीबाबतही पवारांनी चिंता व्यक्त केली. “विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले तरी नोकऱ्यांचा प्रश्न सुटत नाही. तरुणांमध्ये निराशा पसरली आहे. मुलांना नोकऱ्या मिळत नसल्याने राज्यात एक नकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे,” असे ते म्हणाले.
महाविकास आघाडीला मतदानाचे आवाहन
पुढील निवडणुकीत भाजप सरकारला सत्तेतून दूर करण्याचे आवाहन करत, पवार म्हणाले, “लोकसभेनंतर विधानसभेची निवडणूक आपल्यासमोर आहे. महाराष्ट्राचा कारभार योग्य हातांत देण्यासाठी आपल्याला ठरवायचे आहे. मागील पाच वर्षांतील भाजप सरकारचा अनुभव पाहता, सत्तेचा बदल करणे हे आवश्यक झाले आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या मतांनी निवडून आणल्याशिवाय महाराष्ट्राचे भवितव्य सुरक्षित होणार नाही.”
महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास पुन्हा उभा करण्याचा निर्धार
महाराष्ट्राच्या प्रगतीचा गौरवशाली इतिहास आठवून, पवार म्हणाले, “यशवंतराव चव्हाण आणि वसंतराव नाईक यांच्या काळातील महाराष्ट्राची दिशा पाहिली तर सध्याचा महाराष्ट्र अधोगतीकडे चालला आहे. विकासाच्या दिशेने जाणाऱ्या या राज्याचे सरकारने नुकसान केले आहे. महत्त्वाचे प्रश्न सोडवण्यात सरकार अपयशी ठरले आहे.”
पवारांनी स्पष्ट केले की भाजप आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पाठिंबा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. “गौरवशाली महाराष्ट्र पुन्हा उभा करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. महाराष्ट्राच्या हितासाठी वाटेल ती किंमत मोजायची वेळ आली तरी आम्ही मागे हटणार नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.