संगमनेरमध्ये तणावः वादग्रस्त वक्तव्यामुळे गाड्यांची तोडफोड, जयश्री थोरात पोलीस स्टेशनबाहेर रात्रभर

By janshahi24news

Published on:

Follow Us
---Advertisement---

संगमनेरमध्ये सध्या तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते सुजय विखे पाटील यांच्या सभेत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं गेलं, ज्यामुळे संगमनेरच्या धांदरफळ येथे घडलेल्या या घटनेनंतर परिस्थिती अधिकच चिघळली आहे. भाजपचे नेते वसंतराव देशमुख यांनी केलेल्या या टिप्पणीमुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली, परिणामी गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ यांसारख्या घटना घडल्या.

जयश्री थोरात यांनी या वक्तव्याचा तीव्र निषेध करताना, रात्रीपासून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं. त्यांच्या सोबत काँग्रेसचे कार्यकर्ते आणि त्यांचे कुटुंबीयही सहभागी झाले. आंदोलनादरम्यान जयश्री थोरात यांनी वसंतराव देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली, परंतु पोलिसांनी गुन्हा दखल करण्यास विलंब केल्यामुळे त्यांच्या संतापात अधिक भर पडली.

काँग्रेस कार्यकर्त्यांनी, या मुद्द्यावर भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी केली, परिणामी विखे पाटील यांच्या ताफ्यावर हल्ला झाला आणि चिखली गावाजवळ त्यांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली. तणावग्रस्त परिस्थितीमुळे परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

वसंतराव देशमुख यांचं वादग्रस्त वक्तव्य

भाऊसाहेब थोरात यांची नात… ती तर बोलती म्हणत्यात… माझा बाप सगळ्याचा बाप… काही कळत नाही. तुला सुद्धा पोरं कशी झाले हा प्रश्न आहे. आपल्या कन्येला समजवा. नाहीतर आम्ही जर निवडणूक काळात मैदानात उतरलो तर तुमची मुलगी घराबाहेर पडू शकणार नाही. तिला सुजय दादा प्रेमाने ताई म्हणतात. बरोबर आहे, त्यांची संस्कृती आहे ती. पण दादा, या ताईचे पराक्रम जर पाहिले ना… सगळ्या तालुक्याला माहिती आहेत, असं वसंतराव देशमुख म्हणाले. त्यांच्या या विधानाने वाद निर्माण झाला आहे.

या घटनेनंतर जयश्री थोरात यांनी पोलिसांकडे आपला गुन्हा दाखल करण्याचा आग्रह धरला, अखेर रात्री उशिरा पोलिसांनी वसंतराव देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला. जयश्री थोरात यांनी आपल्या आंदोलनाद्वारे या प्रकरणी न्याय मिळवण्याचा प्रयत्न केला आहे, आणि त्यांचा पाठिंबा वाढत चालला आहे. काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांवर सुजय विखे समर्थकांकडून धक्काबुक्की करण्यात आल्याचा दावा देखील केला गेला आहे. सुजय विखे पाटील यांच्या काही समर्थकांवर आणि सरपंचावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या घटनेमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात तापलेली परिस्थिती अधिकच तीव्र बनली आहे.

Leave a Comment

" target="_blank" rel="nofollow noreferrer noopener">