Raj Thackeray on Manoj jarange: मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील सर्व राजकीय पक्षांवर पुन्हा एकदा ताशेरे ओढले आहेत. त्यांनी लातूरमध्ये झालेल्या सभेत यावेळी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाबद्दल आणि त्यासंदर्भात घेण्यात आलेल्या आश्वासनांवर परखड भाष्य केले. राज ठाकरे यांनी म्हटले की, मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी वेगवेगळे पक्ष एकत्र आले होते, परंतु आजवर मराठा समाजाला आरक्षण मिळालेले नाही. त्यांनी या संदर्भात उपस्थित नेत्यांना थेट प्रश्न विचारत म्हटले की, “जेव्हा मुंबईत मोर्चा निघाला तेव्हा शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व्यासपीठावर येऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन देत होते. मग आजवर हे आरक्षण का नाही दिले?
राज ठाकरेंनी मनोज जरांगे पाटील यांच्याही भूमिकेवर टिप्पणी केली. काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांनी राज्यातील विधानसभा निवडणुका लढवण्याची घोषणा केली होती. मात्र, नंतर त्यांनी निवडणुका न लढवता राजकीय पक्षांच्या पाडापाडी करण्याचे मत मांडले. यावर राज ठाकरेंनी सांगितले की, “जर तुम्हाला निवडणूक लढवायची असेल तर लढवा, आणि पाडायची असेल तर पाडा. पण हे आरक्षण देण्याचे मार्ग तुम्ही ठरवणार कसे? हा मुद्दा माझ्यासाठी महत्त्वाचा आहे.
आरक्षणाचा विषय स्थानिक नव्हे तर देशभराचा
राज ठाकरे यावेळी मराठा आरक्षणाचा विषय केवळ महाराष्ट्रापुरता सीमित नसून देशव्यापी असल्याचेही स्पष्ट केले. ते म्हणाले, “कोणतेही राज्य सरकार आरक्षण देऊ शकत नाही, कारण हा संपूर्ण देशाचा प्रश्न आहे. जर महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण दिले, तर इतर राज्यातही विविध जातींचे प्रश्न पुढे येतील. त्यामुळे ही केवळ महाराष्ट्राची नव्हे तर संपूर्ण देशाची समस्या आहे.”
त्यांनी मनोज जरांगे यांना उद्देशून असेही सांगितले की, त्यांनी जेंव्हा आंदोलन केले तेव्हा मी भेटायला गेलो होतो. त्यावेळी मी त्यांना आरक्षणाच्या बाबतीत सत्य परिस्थिती सांगितली होती. “हे असे आरक्षण मिळू शकत नाही, त्यासाठी एकमेकांमध्ये भांडत राहण्याचा काहीच उपयोग नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
शरद पवारांवर टीका
राज ठाकरेंनी यावेळी शरद पवारांवरही जोरदार टीका केली. त्यांनी म्हटले की, “1999 साली शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली, त्यानंतर महाराष्ट्रात जातीयता बळकट होत गेली.” राज ठाकरेंनी म्हटले की, मागील अनेक वर्षांपासून शरद पवारांना राजकारणात संधी मिळाली, परंतु त्यांनी केवळ बारामतीसाठीच काम केले, उर्वरित महाराष्ट्रासाठी त्यांनी फारसे प्रयत्न केले नाहीत. मराठवाडा आणि विदर्भ या भागांमध्ये आजही उद्योगधंदे नाहीत, त्यामुळे या भागातील विकासाचा मुद्दा दुर्लक्षित राहिला आहे. शरद पवारांवर टीका करताना राज ठाकरेंनी सांगितले की, “त्यांनी बारामतीसाठी अनेक योजना आणि उद्योगधंदे आणले, पण बाकीच्या महाराष्ट्राचा कधी विचार केला नाही. यामुळे मराठवाड्यात, विदर्भात रोजगाराची संधी आजही कमी आहे.”
राज ठाकरेंचा संदेश
राज ठाकरे यांच्या या भाषणानंतर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आणि राज्यातील राजकीय वातावरणात पुन्हा एकदा हलचाली सुरू झाल्या आहेत. राज ठाकरेंनी उपस्थित केलेले मुद्दे फक्त आरक्षणपुरते मर्यादित नसून राज्याच्या एकूण विकासावरही भाष्य करत आहेत. मराठा समाजाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, राज ठाकरेंनी राजकीय पक्षांच्या कथित द्वैध भूमिकांवर टीका केली. या भाषणातून राज ठाकरेंनी राज्यातील जनतेला असा संदेश दिला की, आपण एकत्र येऊन या मुद्द्यांवर विचार करावा.