Mahayuti CM Race : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या भव्य यशानंतर मुख्यमंत्रीपदाची चर्चा रंगली आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यापैकी कोण मुख्यमंत्री होणार, याबाबत सध्या राजकीय वर्तुळात चांगलाच गदारोळ सुरू आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजपने एकहाती 132 जागा जिंकत महायुतीच्या विजयाचे प्रमुख शिल्पकार ठरले आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत, असा आग्रह भाजप समर्थकांनी धरला आहे.
Mahayuti CM Race
महायुतीतील दुसरा प्रमुख घटक असलेल्या शिंदे गटाचे नेते आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मुख्यमंत्रिपदासाठी आक्रमक पवित्रा घेतल्याचे चित्र होते. निवडणुकीत महायुतीच्या यशात आपलेही मोलाचे योगदान असल्याचा दावा त्यांनी केला. शिंदे समर्थकांनी विविध स्तरांवर मुख्यमंत्रिपदासाठी मोर्चेबांधणी केली. राज्यातील काही ठिकाणी शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदासाठी विशेष पूजा-अर्चा करण्यात आली, तर सोशल मीडियावर त्यांची लोकप्रियता दाखवणाऱ्या पोस्ट्सने जोर धरला.
Mahayuti CM Race
शिंदे गटाच्या या हालचालींना भाजप नेतृत्वाने मात्र फारसा प्रतिसाद दिला नाही. दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी स्पष्ट संदेश दिला की, देवेंद्र फडणवीस हेच पुढील मुख्यमंत्री असतील. भाजपने शिंदे गटाला मुख्यमंत्रिपदाचे कोणतेही आश्वासन दिले नव्हते, असे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी ठामपणे सांगितले. याशिवाय, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (रिपाई) प्रमुख रामदास आठवले यांनीदेखील फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करण्याचा सल्ला दिला. त्यांनी शिंदे यांना केंद्रात मोठी जबाबदारी स्वीकारण्याचे सूचवले.
Mahayuti CM Race
भाजपकडून आलेल्या या ठाम भूमिकेमुळे शिंदे गटाच्या मुख्यमंत्रिपदावरील दाव्याला धक्का बसला. काही दिवसांपासून आक्रमक असलेल्या शिंदे गटातील नेत्यांनी अखेर मवाळ भूमिका स्वीकारली. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी भाजप नेतृत्वाचा निर्णय मान्य असल्याचे जाहीर केले. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपल्या नेत्याला मुख्यमंत्री व्हावे, असे वाटणे स्वाभाविक असल्याचे ते म्हणाले. मात्र, मुख्यमंत्रीपदाचा निर्णय भाजप नेतृत्व घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
Mahayuti CM Race
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील बंडखोरी करून स्वतंत्र गट निर्माण केला होता. महायुतीत सामील होऊन त्यांनी भाजपसोबत युती केली. निवडणुकीत शिंदे गटानेदेखील काही मोजक्या जागांवर विजय मिळवत आपले अस्तित्व दाखवून दिले. त्यांचे समर्थक हा यशाचा भाग शिंदे यांच्या नावावर लिहित आहेत. त्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी अडीच वर्षे तरी संधी मिळावी, असा आग्रह धरला होता. मात्र, भाजपने शिंदे यांना हा दावा सोडण्यास भाग पाडले.
मुख्यमंत्रीपदावरून सुरू असलेल्या या रस्सीखेचीमुळे महायुतीतील एकता आणि शिंदे गटाचा पुढील राजकीय प्रवास कसा असेल, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. शिंदे गटाची आक्रमकता आणि नंतरची माघार भाजपच्या प्रभावी रणनीतीचे द्योतक मानली जात आहे. फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने राज्यात स्थैर्य राखून पुढे जाण्याचा संकल्प केला आहे.