Maharashtra Vidhansabha election 2024 : भाजपने मागील रविवारी ९९ उमेदवारांची यादी जाहीर करत निवडणुकीच्या तयारीला वेग दिला होता. भाजपच्या या पहिल्या यादीनंतर, सगळ्यांचं लक्ष लागलं होतं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची यादी कधी जाहीर होणार. या चर्चेला आता विराम मिळाला आहे कारण अखेर शिंदे गटाच्या शिवसेनेने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे.भाजपच्या जलद हालचालींच्या पार्श्वभूमीवर, शिवसेनेनेही आता आपले पत्ते उघडले आहेत. या यादीमध्ये काही महत्त्वाच्या नेत्यांसह नव्या चेहऱ्यांनाही स्थान देण्यात आलं आहे. त्यामुळे आता या तिन्ही पक्षांमधील राजकीय खेळी अधिकच रंगतदार होणार असल्याचे चित्र दिसत आहे.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. या यादीत 45 उमेदवारांची नावे समाविष्ट असून, विशेष म्हणजे यंदा 6 नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. शिंदे गटाने शिवसेनेच्या पहिल्या यादीत अनुभव आणि नव्या चेहऱ्यांचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला आहे.
या यादीमध्ये काही महत्त्वाच्या व्यक्तींनी जागा पटकावल्या आहेत, चोपडा मतदारसंघातून चंद्रकांत बळवंत सोनवणे यांना उमेदवारी मिळाली आहे, तर एरंडोलमध्ये चिमणराव पाटील यांचा मुलगा अमोल चिमणराव पाटील यांना निवडणूक लढवण्याची संधी मिळाली आहे. पैठण मतदारसंघातून संदीपान भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे, आणि राजापूर मतदारसंघातून मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनाही तिकीट देण्यात आलं आहे.
खानापूर मतदारसंघात दिवंगत आमदार अनिल बाबर यांच्या कार्याला पुढे नेत, त्यांच्या पुत्र सुहास बाबर यांना तिकीट दिलं गेलं आहे. तसेच माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचे पुत्र अभिजित अडसूळ यांनाही निवडणुकीतून संधी मिळाली आहे. याचबरोबर जोगेश्वरी (पूर्व) मतदारसंघातून खासदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे.
शिंदे गटाच्या या पहिल्या यादीत, पक्षाने वरिष्ठ नेते आणि त्यांच्या वारसांना उमेदवारी देऊन पक्षाच्या पारंपरिक मतदारांमध्ये विश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. तर काही ठिकाणी नवीन चेहऱ्यांना उमेदवारी देऊन ताजेपणा आणण्याचा देखील प्रयत्न झाला आहे. एकूणच, या यादीवरून शिंदे गटाची रणनीती स्पष्ट होते त्यांनी अनुभवासोबत तरुण चेहऱ्यांचा वापर करून पक्षाला एक नवी दिशा देण्याचा निर्णय घेतला आहे.