Maharashtra Cabinet Formation : भाजपचे नवे धोरण वरिष्ठ नेत्यांसाठी धोक्याचे; विखे पाटील, महाजन, बावनकुळे यांच्यासह अनेक नेत्यांना मंत्रिपदाची संधी गमवावी लागणार!

By janshahi24news

Published on:

Follow Us
Maharashtra Cabinet Formation
---Advertisement---

Maharashtra Cabinet Formation : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठा विजय मिळवला आहे. जनतेने भाजप, शिवसेना शिंदे गट, आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला एकत्रित सत्ता दिली आहे. मात्र, निकाल लागून पाच दिवस उलटून गेले तरी मुख्यमंत्रीपदाचा निर्णय अजूनही झाला नाही. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात यावर मोठ्या चर्चा सुरू आहेत, आणि पुढील दोन-तीन दिवसांत मुख्यमंत्री कोण होणार, याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

आज दिल्लीमध्ये भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा होणार आहे. यावेळी सत्ता स्थापनेसाठी अंतिम निर्णय होईल. सध्या मिळालेल्या संकेतांनुसार मुख्यमंत्रीपद हे भाजपाच्याच हातात राहील. अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी देखील जाहीरपणे सांगितले आहे की भाजपाने सर्वाधिक जागा जिंकलेल्या कारणाने मुख्यमंत्रीपद भाजपाचे असणे स्वाभाविक आहे, तसेच भाजपाच्या मंत्र्यांची संख्या देखील अधिक असेल.

काल एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत भाजपाच्या निर्णयाला पूर्ण समर्थन असल्याचे जाहीर केले. त्यांनी म्हटले की, भाजपाचे केंद्रीय नेतृत्व जो निर्णय घेईल, त्याला आपण पाठिंबा देऊ. या निवेदनावरून मुख्यमंत्रीपदासाठी कोणताही अडथळा नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच भाजपाने आपल्या मंत्रिमंडळाचा प्रारूप देखील तयार केल्याची माहिती समोर आली आहे. भाजपकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्याच्या मंत्रिमंडळात 20 भाजप आमदारांना स्थान मिळण्याची शक्यता आहे.

यासोबतच भाजपाच्या धोरणामुळे पक्षाच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांना धक्का बसणार आहे. भाजपने नवीन तरुण नेत्यांना संधी देण्यासाठी 50 वर्षांपेक्षा कमी वयाच्या आमदारांना मंत्री करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. यामुळे 50 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाही. भाजपाने याआधीही कठोर निर्णय घेतले आहेत, जसे की, 75 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या नेत्यांना निवडणुका लढवण्यास परवानगी नसते. या धोरणामुळेच लालकृष्ण अडवाणी आणि मुरलीमनोहर जोशी यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना सक्रिय राजकारणातून निवृत्ती घ्यावी लागली होती.

आता महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळासाठीही असेच धोरण लागू होत असल्याचे संकेत मिळत आहेत. भाजपाला राज्य पातळीवर नवे नेतृत्व तयार करायचे असल्याने 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नेत्यांना मंत्रिपद दिले जाणार नाही. यामुळे काही दिग्गज नेत्यांना मार्गदर्शकाची भूमिका स्वीकारावी लागणार आहे. भाजपच्या या निर्णयामुळे पक्षातील अनेक अनुभवी नेत्यांना धक्का बसण्याची शक्यता आहे.

जर भाजपने हे धोरण अमलात आणले, तर राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, मंगलप्रभात लोढा, आणि मंदा म्हात्रे यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिमंडळाबाहेर राहावे लागेल. तसेच काही तरुण आमदारांना संधी मिळण्याची शक्यता आहे. पक्षाच्या या निर्णयामुळे भाजपच्या राज्य पातळीवरील नेतृत्वात मोठे बदल होणार आहेत.

सध्या सगळ्यांचे लक्ष दिल्लीतील चर्चेकडे लागले आहे. मुख्यमंत्रीपदासाठी भाजपाचे कोणते नाव पुढे येईल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. तसेच महायुतीतील इतर पक्षांना किती मंत्रिपदे मिळतील, यावरून देखील मोठ्या चर्चा सुरू आहेत. अजित पवार गट आणि शिंदे गटाने भाजपाच्या नेतृत्वाला पाठिंबा दिल्याने सत्ता स्थापन होण्यात अडथळा येणार नाही, मात्र मंत्रीपदांच्या वाटपावरून काही मतभेद उद्भवू शकतात. भाजपाचे तरुण आमदार मंत्रिपदी येतील का, ज्येष्ठ नेत्यांना काय भूमिका दिली जाईल, आणि शिंदे-फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर पक्षश्रेष्ठींचा काय निर्णय असेल, याचा उलगडा येत्या काही दिवसांत होईल.

Leave a Comment

" target="_blank" rel="nofollow noreferrer noopener">