Shivsena leader Eknath Shinde : महायुतीच्या प्रचंड विजयानंतर मुख्यमंत्रीपद कोणाला मिळणार, हा प्रश्न राज्याच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. भाजपच्या 137 आमदारांच्या समर्थनामुळे मुख्यमंत्रीपद त्यांच्याच गोटात जाणार, हे जवळपास निश्चित झालं आहे. सुरुवातीला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी आपला दावा कायम ठेवत भाजपवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाजपने हा दबाव झुगारून देवेंद्र फडणवीस यांच्याच नावाला प्राधान्य दिलं.
Eknath Shinde
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून माघार घेतली असली, तरी त्यांनी आपली महत्त्वाकांक्षा गमावली नाही. त्यांनी मुख्यमंत्रीपदाच्या बदल्यात केंद्रात महत्त्वाचे खाते किंवा राज्यात उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर नाकारत थेट महायुती सरकारच्या संयोजकपदाची मागणी केली आहे. यासोबतच आपल्या मुलाला, श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद मिळावे, असा प्रस्ताव भाजपकडे ठेवला आहे. त्यांच्या या मागणीमुळे महायुतीच्या गोटात पेच निर्माण झाला असून भाजपने यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
Eknath Shinde
श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद देण्याच्या मागणीवर भाजपमधील नेत्यांमध्ये मतभेद आहेत. त्यांच्या राजकीय आणि प्रशासकीय अनुभवाचा अभाव हा एक मोठा मुद्दा आहे. अजित पवारांच्या अनुभवी नेतृत्त्वाच्या तुलनेत श्रीकांत शिंदे यांना थेट उपमुख्यमंत्रीपद देणे कितपत योग्य ठरेल, याबाबत साशंकता आहे. यामुळे महायुतीच्या शपथविधीला उशीर होत आहे.
Eknath Shinde
यासोबतच अजित पवारांच्या खेळीमुळे एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग पॉवरही कमी झाली आहे. महायुती सरकार स्थापनेसाठी देवेंद्र फडणवीस यांना समर्थन देऊन अजित पवार गटाने शिंदे गटाची ताकद कमी केली. यामुळे शिंदे गटात नाराजी पसरली असून काही नेते यावर उघडपणे बोलू लागले आहेत. रामदास कदम यांनी या परिस्थितीवर भाष्य करत अजित पवार गटामुळे शिंदे गटाचं महत्त्व कमी झाल्याची खंत व्यक्त केली आहे.
Eknath Shinde
एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या प्रचारात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या नेतृत्त्वाखाली लढलेल्या निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं, मात्र भाजपच्या विजयामुळे मुख्यमंत्रिपदाचा दावा त्यांच्याकडून गमावण्याची वेळ आली. त्यांनी संयोजकपदाच्या मागणीद्वारे आपलं राजकीय स्थान टिकवण्याचा प्रयत्न केला आहे.
भाजपच्या थिंक टँकमध्ये या मागणीवर चर्चा सुरू असून अंतिम निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी माघार घेतली असली तरी त्यांच्या मागण्या महायुतीसाठी नवा पेच निर्माण करत आहेत. त्यांच्या प्रस्तावावर भाजपचा निर्णय काय असेल आणि महायुती सरकारचा शपथविधी कधी होईल, याकडे राज्याच्या राजकारणाचं लक्ष लागलं आहे.