Bollywood : बॉलिवूडमध्ये जितक्या चर्चा चित्रपटांच्या असतात, तितक्याच चर्चा कलाकारांच्या खाजगी आयुष्याबद्दलही रंगतात. प्रेमसंबंध, ब्रेकअप्स, लग्न, घटस्फोट, किंवा कुटुंबातील वाद-याबद्दल गॉसिप नेहमीच होत असतात. यातीलच एक चर्चेत असलेला वाद म्हणजे लोकप्रिय अभिनेता गोविंदा आणि त्यांचा भाचा, कॉमेडियन कृष्णा अभिषेक यांच्यातील मतभेद. मात्र, तब्बल सात वर्षांनंतर अखेर हा वाद मिटल्याचे दिसून येत आहे.
मामाला भेटायला गेला कृष्णा
गेल्या काही वर्षांत गोविंदा आणि कृष्णा यांच्या कुटुंबात सतत वाद सुरू असल्याचं सर्वांनाच माहित आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी गोविंदांच्या घरी एक अनवधानाने घडलेली घटना मोठ्या वादाची सुरुवात ठरली. पिस्तूल साफ करत असताना गोविंदांच्या पायाला गोळी लागली आणि त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गोविंदांच्या प्रकृतीसाठी अनेकांनी प्रार्थना केल्या, ज्यात कृष्णा अभिषेकही होता. मात्र, त्यावेळी तो कामानिमित्त ऑस्ट्रेलियात असल्याने गोविंदाला प्रत्यक्ष भेटू शकला नव्हता, पण त्याची पत्नी कश्मिरा शाह मामाला भेटायला गेली होती.
भावनिक क्षण
भारतात परतल्यावर कृष्णा पहिल्यांदाच गोविंदांच्या घरी गेला. तो म्हणाला, “मी सात वर्षात पहिल्यांदा मामाच्या घरी पोहोचलो. हे जणू अर्धा वनवास पूर्ण झाल्यासारखं वाटलं. आम्ही जवळपास एक तास एकत्र होतो, आणि मी नम्मोला (टीना आहुजा) देखील भेटलो. ती भेट खूप भावनिक होती. मी त्यांना मिठी मारली, आणि भूतकाळातील गोष्टींचा अजिबात उल्लेख केला नाही.”कृष्णाने स्पष्ट केलं की, दोघांनीही भूतकाळातील वाद विसरण्याचा निर्णय घेतला आहे. तो पुढे म्हणाला, “आम्ही एक कुटुंब आहोत, आणि गैरसमज होणं स्वाभाविक आहे. मात्र, अशा गोष्टींमुळे आम्ही एकमेकांपासून दूर राहणार नाही. मामी व्यस्त असल्यामुळे भेट होऊ शकली नाही, पण मी पुन्हा त्यांच्याकडे जाईन आणि मामा-मामींना भेटेन.”
मामासाठी भावनिक पोस्ट…?
काही दिवसांपूर्वी कृष्णाने गोविंदासाठी एक भावनिक पोस्ट लिहिली होती, ज्यात त्याने गोविंदाच्या हुशारीची प्रशंसा केली आणि आपलं अर्थ रक्त त्यांचं असल्यामुळे तोही हुशार आहे असं म्हटलं, त्याने गोविंदाला लवकर बरा होण्याची शुभेच्छा देत म्हटलं होतं, “मला तुमच्यासोबत पुन्हा नाचायचं आहे.” ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली, आणि चाहत्यांनी मामा-भाचाच्या एकत्र येण्याचं स्वागत केलं.
वादाचा शेवट
गोविंदा आणि कृष्णा यांच्यातील वादाचा मुख्य मुद्दाकृष्णाच्या काही विनोदांवर गोविंदाचा आक्षेप होता. याशिवाय, कृष्णाच्या पत्नी कश्मिरा शाहवर गोविंदाच्या कुटुंबाने गैरवर्तनाचा आरोप केला होता. पण आरतीच्या लग्नात गोविंदा आणि कश्मिरा यांच्यात झालेल्या संवादानंतर दोघांमध्ये मतभेद मिटू लागले, आणि आता सात वर्षांनंतर हा वाद संपल्याचं दिसतं.