Ayushman Bharat Pradhan Mantri Jan Arogya Yojana : भारत सरकारने ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ (PM-JAY) अंतर्गत मोठा विस्तार करून वृद्धांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. धनत्रयोदशी व 9व्या आयुर्वेद दिनानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 70 वर्षे व त्याहून अधिक वयाच्या नागरिकांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारांची सुविधा जाहीर केली आहे. यामुळे 6 कोटी भारतीय वृद्धांना आता योजनेचा लाभ घेता येणार आहे, विशेषतः ज्यांना यापूर्वी वैद्यकीय सेवांच्या खर्चाचा त्रास सहन करावा लागत होता.
पंतप्रधान मोदी यांनी दिल्लीत ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद’ (AIIA) मध्ये आयोजित कार्यक्रमात ‘आयुष्मान वय वंदन’ कार्ड देण्यास प्रारंभ केला. या कार्डाच्या माध्यमातून, आता वृद्धांना विनामूल्य वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार आहे. विशेषतः वयोवृद्ध व्यक्तींना त्यांच्यावरील आर्थिक ताण हलका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आयुष्मान वय वंदन कार्डामुळे रुग्णालयांमध्ये नोंदणी आणि उपचार प्रक्रियाही सुलभ होणार आहे.
मोदींनी भाषणादरम्यान खेद व्यक्त करत सांगितले की, दिल्ली आणि पश्चिम बंगालच्या राज्य सरकारांनी या योजनेत सामील होण्यास नकार दिला आहे. त्यामुळे, या राज्यातील वृद्धांना या सुविधेचा लाभ घेता येणार नाही, हे अत्यंत खेदजनक आहे. मोदींनी सांगितले की, “माझ्या हृदयाला यातना होत आहेत की मी दिल्ली व बंगालमधील वृद्ध नागरिकांना मदत करू शकत नाही. राजकीय मतभेदांमुळे ज्येष्ठ नागरिकांवर हा परिणाम होत आहे.
मोदींनी नुकतेच 29 ऑक्टोबर रोजी 12,850 कोटी रुपयांच्या आरोग्य प्रकल्पांचे उद्घाटन केले. या प्रकल्पांतर्गत मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि बिहारसह 18 राज्यांमध्ये नव्या रुग्णालयांची स्थापना आणि वैद्यकीय सुविधांचा विस्तार करण्यात येणार आहे. यामुळे लाखो नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळणार आहे. पंतप्रधानांनी ऋषिकेश एम्समधून देशातील पहिली ‘एअर अॅम्ब्युलन्स संजीवनी’ देखील लाँच केली, ज्यामुळे आपत्कालीन स्थितीत तातडीची वैद्यकीय मदत पोहोचवणे अधिक सुलभ होणार आहे.
पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की, निवडणुकीच्या वेळी त्यांनी आश्वासन दिले होते की, तिसऱ्या टर्ममध्ये 70 वर्षांवरील सर्व वृद्धांना योजनेच्या कक्षेत आणले जाईल. यामध्ये आयुष्मान भारत योजनेत उत्पन्नाच्या कोणत्याही मर्यादेशिवाय वृद्धांना लाभ मिळणार आहे, त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा कायम राहील. आता वृद्ध नागरिकांना उपचाराच्या खर्चामुळे कुटुंबावर आर्थिक ताण येणार नाही.
मोदींनी यावेळी जनऔषधी केंद्रांबद्दलही माहिती दिली. देशभरात सुमारे 14,000 पंतप्रधान जनऔषधी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत, जिथे गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी 80 टक्के सवलतीत औषधोपचाराची सुविधा उपलब्ध आहे. ही केंद्रे सरकारची संवेदनशीलता दाखवतात. या केंद्रांमुळे गरीब व मध्यमवर्गीयांच्या औषधोपचाराच्या खर्चात लक्षणीय बचत झाली आहे. जनऔषधी केंद्रे नसती तर गरीब आणि मध्यमवर्गीयांना 30,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च करावा लागला असता.
मोदींनी नमूद केले की, आपल्यापैकी बहुतेक जण अशा परिस्थितीतून आले आहेत, जिथे एखाद्या आजारामुळे संपूर्ण कुटुंबाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला आहे. एखादा कुटुंबीय आजारी पडल्यास त्याचा संपूर्ण घरावर परिणाम होतो. एकेकाळी उपचारासाठी लोकांना घर, जमीन विकण्याची वेळ येत होती. विशेषतः गरीब कुटुंबातील वृद्धांना उपचारांसाठी पैसे नसल्याने आपल्या आजारांना निमूटपणे सहन करावे लागले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी हे देखील स्पष्ट केले की, निवडणुकीच्या वेळी दिलेल्या आश्वासनांप्रमाणे 70 वर्षांवरील वृद्धांना योजनेचा लाभ मिळणार आहे. धन्वंतरी जयंतीच्या मुहूर्तावर योजनेचा विस्तार करत असल्याने त्यांना समाधान आहे. या योजनेच्या माध्यमातून वृद्धांना सन्मानाने जगता यावे, हा सरकारचा उद्देश आहे.